एकीकडे उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्रित येतील, अशा राजकीय वावड्या उठल्यात. तर दुसरीकडे कोकणात खासदार नारायण राणे यांचे दोन पुत्र पालकमंत्री नितेश व आमदार निलेश राणे यांच्यामध्ये राजकीय कुस्ती सुरू झालीय. दोघांची बोलण्याची भाषाही बदललीय. आता हेच बघा ना. नितेश राणेंनी शिवसेनेतील नेत्यांना दम दिल्यानंतर, निलेश हे पक्षासाठी धावून आलेत. नितेशने जपून बोलावे.. मी भेटल्यावर बोलेनच पण बोलताना भान ठेवून बोलले पाहिजे, असा सल्ला आमदार निलेश राणे यांनी दिलाय. त्यावर नितेश राणे यांनी ‘निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात’ असे प्रत्युत्तर दिलंय. यावरून दोघा भावांमध्ये राजकीय शिमगा सुरू झालाय. हा शिमगा का सुरू झालाय. त्याला कारणे काय आहेत हे आपण पाहुया…
नितेश राणेंनी राजकारणात जम, निलेश यांचा राजकीय वनवास
निलेश हे 2009 मध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. परंतु 2014 ते 2019 मध्ये ते लोकसभेला पराभूत झाले. 2019 ला ते भाजपमध्ये आले. दोनदा पराभूत झाल्याने त्यांचा राजकीय वनवास सुरू झाला होता. परंतु लहान भाऊ नितेश राणे यांचा राजकीय उदय झाला. ते 2014 मध्ये पहिल्यांदाच कणकवली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावरून निवडून आले. पण 2019 मध्ये ते भाजपमध्ये आले आणि पुन्हा आमदार झाले. 2024 ला त्यांनी विजयाची हॅटट्रीक केली.
नितेश हे फडणवीसांचे खास झाले अन मंत्रीही
निलेश राणेंपेक्षा नितेश राणे हे आक्रमक आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांचा आक्रमकपणा हेरला. त्यातून नितेश राणे हे राज्यभर फिरले आणि हिंदुत्वाचा चेहराही झाले. तिसऱ्यांदा विजय मिळविल्याने फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतले. मत्यव्यवसाय व बंदरे हे खाते ही दिले. तर सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपदी वर्णी लावली.
तर निलेश राणेंचा राजकीय वनवास संपला. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले आणि कुडाळ मतदारसंघातून आमदार झाले. वैभव नाईक यांचा पराभव करून त्यांनी वडिलांचा पराभवाचा वचपा काढला. एकीकडे राजकीय संन्यास घेण्याची घोषणा करणारे निलेश राणे पुन्हा राजकारणात सक्रीय झाले. त्याचे श्रेय ते एकनाथ शिंदे यांनाच देतात. एप्रिल महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित कुडाळमध्ये एका कार्यक्रम झाला आहे. त्यात निलेश राणे म्हणाले, माझ्या कपाळी सोळा वर्षानंतर गुलाल लावण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे. त्यामुळे मी त्यांना या जन्मात तरी सोडणार नाही. मला पुन्हा जिवंत केलं आहे.
माझ्या मतदारसंघातील समस्या, काही प्रश्न असतील तर मी थेट एकनाथ शिंदे यांच्याशी बोलते. सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना वाढविणार आहे कोणी आडवा आला तरी मी काम थांबविणार नाही, असे निलेश राणेंनी जाहीर करून टाकले. घरात पालकमंत्री असतानाही निलेश राणे हे नितेश यांना विचारत नाही, असा त्याचा अर्थ लावला गेला. त्याच्या बातम्याही झाल्या. त्यावरून सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे प्रचंड चिडले होते. मीडियावाले आमच्या घरात फूट पाडत आहेत, अशा चुकीच्या बातम्या देऊ नका, असे नितेश राणे यांचे म्हणणे होते.
एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या शिवसेनेवर कुणी टीका करायला लागल्यानंतर आता निलेश राणे हे ढाल बनून पुढे येतायत.दोन दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे आहे. जिल्हा नियोजन समितीच्या कामांवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद झालेत. त्यातून काही कामांना स्थगिती दिलीय.
कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री देवेंद्र बसलाय हे लक्षात ठेवा, अशी दम देण्याची भाषा नितेश राणेंची होती. त्याला लगेच निलेश राणे यांनी एक ट्वीट चोखप्रत्युत्तर दिले. निलेशने जपून बोलावे.. मी भेटल्यावर बोलेनच पण बोलताना भान ठेवून बोलले पाहिजे, असे ट्वीट निलेश राणे यांचे होते. त्यावर लगेच नितेश राणे यांनी‘निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात’असे प्रत्युत्तर दिले. दोघांच्या वादाची चर्चा सुरू झाल्यानंतर दोघांनी आपले ट्वीट डिलिट केले. या घटनांवरून राणे बंधुंमध्ये जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे.
माझ्या मुलांमध्ये कधीही भांडणे होत नाहीत, असे नारायण राणे यांनी अनेकदा सांगितले आहे. परंतु दोघे भाऊ वेगवेगळ्या पक्षात असल्याने दोघेही आता आमने-सामने येत असल्याचे दिसून येत आहे. पक्ष वाढविण्यासाठी एकनाथ शिंदे व भाजपमध्ये स्पर्धा आहे. आता ही स्पर्धा राणे बंधुंमध्ये ही जोरदार सुरू झाली आहे हे नक्की.
Leave a Reply