राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन सोहळा आज पुण्यात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा. नव्या चेहऱ्यांना संधी द्या, अशी विनंती व्यासपीठावरुन केली. त्यांच्या या विनंतीनंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. जयंत पाटील हा राजकारणातून पूर्णपण संपलेला विषय आहे असे पडळकर म्हणाले आहेत.
गोपीचंद पडळकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांनी जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपद सोडण्याच्या वक्तव्यावर विचारले. त्यावर पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खरमरीत टीका केली. पडळकर म्हणाले, जयंत पाटील हा विषय आता राजकारणातून पूर्णपणे संपला आहे. जयंत पाटील पळ काढणारा माणूस आहे. रणांगणात टिकणारा नाही. अनुकंपा तत्वावर भरती झालेला कार्यकर्ता असल्यामुळे लढाऊ नाही.
जयंतरावांनी कधी कुणासाठी संघर्ष केला नाही. एखादा दिवस जेलमध्ये गेलेले नाहीत. एखादा मोठा प्रोजेक्ट त्यांनी सांगली जिल्ह्यासाठी आणला नाही. सायकल पंक्चर झाल्यानंतर पंक्चर काढता येते मात्र टायर फुटल्यानंतर टायर पूर्णपणे बदलावा लागतो, तशी अवस्था जयंत पाटील यांच्याबाबत झाली आहे, असा टोला पडळकर यांनी लगावला.
काय म्हणाले होते जयंत पाटील?
‘मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे. पक्ष २७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. देशपातळीवर या पक्षानं मोठ योगदान दिल्याचे जयंत पाटील म्हणाले.
पक्षीय मतभेद बाजूला ठेवून देश संकटात तेव्हा एक व्हायचं असतं असं पवारांनी सांगितल असे म्हणत जयंत पाटलांनी ऑपरेशन सिंदूरबाबत जगभरात पाठवलेल्या शिष्टमंडळवर भाष्य केले. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ गेलं त्यांनी भारताची बाजू भक्कमपणे मांडल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
पक्ष संघटनेचं काम जयंतरावांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. त्यांच्या मागे आपण सगळेच उभे आहोत. जयंत पाटलांनी जी विनंती केली आहे त्याबाबत प्रमुख सहकाऱ्यांना एकत्र घेऊ. त्यांच्याशी संवाद करू आणि पुढे याबाबतीत सामूहिकपणे निर्णय घेऊ. याचबरोबर तालुका आणि जिल्हा पातळीवरही पक्षात नवे चेहरे दिसायला हवेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत तेव्हा नव्या चेहऱ्यांना संधी देऊ या असे शरद पवार जयंत पाटील यांच्या विनंतीवर म्हणाले होते.
Leave a Reply