Sonam Raghuvanshi पेक्षाही निर्दयी सांगलीची राधिका! वटपौर्णिमेलाच पतीला संपवलं; नवरा झोपेत असताना…

देशभरामध्ये सोनम रघुवंशीने तिच्या पतीची हनिमूनदरम्यान हत्या केल्याचं प्रकरण गाजत असतानाच महाराष्ट्रातही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीमधील कुपवाडा येथे एका महिलेने आपल्या पतीची निर्घृण हत्या केली असून हा सारा धक्कादायक प्रकार वटपौर्णिमेच्या दिवशीच घडला आहे.

आरोपी आणि मयत व्यक्तीची ओळख पटली
समोर आलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्तीची ओळख पटली आहे. मयत व्यक्ती 50 वर्षांची असून त्याचं नाव अनिल तानाजी लोखंडे असं आहे. ते कुपवाडमधील एकता नगर येथे वास्तव्यास होते. अनिल यांच्या राहत्या घरीच हा प्रकार घडला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी पत्नी राधिका इंगळेला हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

15 दिवसांपूर्वीच झालेलं लग्न
विशेष म्हणजे 15 दिवसांपूर्वीच अनिल आणि राधिका यांचं लग्न झालं होतं. मात्र लग्नाला एक आठवडा झाल्यानंतर अनिल आणि राधिका यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. काही दिवसांपूर्वी झालेल्या या भांडणाचा राग राधिकाच्या मनात घर करुन बसलेला. याच रागातून तिने वटपौर्णिमेच्या रात्री झोपेत असलेल्या पतीवर हल्ला केला आणि त्याला संपवलं.

…म्हणून केलेलं दुसरं लग्न
गाढ झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात राधिकाने कुऱ्हाडीने घाव घालत त्याची हत्या केली.अनिल लोखंडे यांची पहिली पत्नी मयत झाल्याने 17 मे रोजी अनिल लोखंडे यांनी राधिकाशी लग्न केलं होतं. या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राधिकाला ताब्यात घेतलं. पोलिसांनी अनिल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

या प्रश्नांची उत्तर शोधत आहेत पोलीस
राधिका आणि अनिल यांच्यामध्ये वटपौर्णिमेच्या आधीच्या दिवशी काही कारणाने पुन्हा वाद झाला होता का? नेमकं त्या दोघांमध्ये भांडण कशामुळे झालेलं? या हल्ल्याची राधिकाच्या ओळखीतील इतर कोणाला पूर्व कल्पना होती का? राधिकाचा पूर्वइतिहास काय आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *