भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आशिया कप २०२५ स्पर्धा होणार की नाही, असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यासंदर्भात आता नवी माहिती समोर येत आहे. आशियाई क्रिकेट परिषदेकडून ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्याचा विचार सुरु आहे. सप्टेंबरमध्ये टी-२० प्रकारात या स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत विचार सुरु असल्याचेही समजते. यंदाच्या हंगामातील आशिया कप स्पर्धेसंदर्भात सकारात्मक गोष्ट समोर येत असली तरी टीम इंडियाच्या या स्पर्धेतील सहभागाबद्दल अनिश्चितता कायम असल्याचेही दिसून येते. इथं जाणून घेऊयात सविस्तर

जर सर्वकाही ठिक झाले तर आशिया कप २०२५ स्पर्धा ही युएईच्या मैदानात खेळवली जाऊ शकते. यंदाच्या हंगामातील आशिया कप स्पर्धेचे यजमानपद हे भारताकडे आहे. पण पाकिस्तान संघामुळे ही स्पर्धा युएईच्या मैदानात खेळवण्याचा विचार केला जाऊ शकतो. सध्याच्या घडीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हेच आशिया क्रिकेट परिषदेचे प्रमुख आहेत. त्यांच्यासह आशियाई क्रिकेट परिषदेच्या अधिकाऱ्यांना भारतीय संघ या स्पर्धेत खेळेल, अशी आशा आहे. पण बीसीसीआयने मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
आशिया कप स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या आठ संघांमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, युएई, ओमन आणि हाँगकाँग या संघांचा समावेश आहे. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणं अपेक्षित आहे. गत हंगामातील आशिया कप स्पर्धेचे यजमानपद हे पाकिस्तानने भुषवले होते. २०२३ मध्ये पार पडलेल्या स्पर्धे वेळी भारतीय संघासाठी निम्मे सामने हे श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी ही स्पर्धा वनडे प्रकारात खेळवण्यात आली. आता २०२६ च्या टी २० वर्ल्ड कपचा विचार करताना यंदाच्या हंगामातील आशिया कप स्पर्धात टी-२० प्रकारात खेळवण्यात येणार आहे.
Leave a Reply