राज्यातील नवीन शैक्षणिक वर्ष १६ जूनपासून सुरू होत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शालेय शिक्षण विभागाने एक कठोर निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शाळा बस चालक, महिला कर्मचारी व सफाई कामगारांची दर आठवड्याला मद्यपान व अंमली पदार्थांची चाचणी केली जाणार आहे. हा नियम राज्यातील सर्व खासगी व सरकारी शाळांसाठी लागू असणार आहे.
विदर्भातील शाळा २३ जूनपासून सकाळच्या सत्रात सुरू होतील. या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व शालेय बसेसना CCTV, GPS यंत्रणा आणि महिला सेविका असणे अनिवार्य करण्यात आले आहे. सुमारे ६ हजारांहून अधिक शाळा बसेस आणि त्यावरील कर्मचारी या धोरणाच्या कक्षेत येणार आहेत.
बस चालक व कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासली जाणार; जबाबदारी शाळांवर :
राज्यात सध्या सुमारे ६ हजार शाळा बसेस कार्यरत असून शासनाच्या निर्णयामुळे त्यातील चालक, क्लीनर व महिला सेविकांची पार्श्वभूमी तपासली जाणार आहे. पूर्वी कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात सहभाग होता का, यासह वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर कागदपत्रांची खातरजमा करण्यात येईल. तपासणीचा भार शाळा व्यवस्थापनावर सोपवण्यात आला असून नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
दर आठवड्याला सकाळी आणि संध्याकाळी मद्यसेवन व अंमली पदार्थ तपासणीसह वाहनांची नियमित देखभाल केली जात आहे का, याची देखील पाहणी होणार आहे. राज्यातील सर्व शाळा व्यवस्थापनांना यासंदर्भात सक्त सूचना पाठवण्यात आल्या आहेत.
पालकांनीही सजग राहण्याची गरज; नियम तोडल्यास दंडात्मक कारवाई :
शालेय बस सेवांबाबत पालकांनीही दक्ष राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बस वेळेवर येते का, चालक ओळखीचा आहे का, बसमध्ये GPS यंत्रणा कार्यरत आहे का, याची खात्री पालकांनी स्वतः करून घ्यावी. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर स्थानिक प्रशासन व परिवहन विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाईल.
शालेय अपघात, गैरवर्तन व अपहरणाच्या घटनांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने हे व्यापक धोरण लागू केले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.
Leave a Reply