कॅप्टन विक्रम बत्रा : खरा ‘शेर शाह’ ठरलेला वीर..

कारगिल युद्धातील पराक्रमाची अमर गाथा, ज्यांनी भारताला विजय मिळवून दिला पण स्वतःला गमावले

26 जुलै – कारगिल विजय दिवस. संपूर्ण भारतासाठी गर्वाचा दिवस. 1999 साली पाकिस्तानविरोधात लढलेल्या कारगिल युद्धामध्ये भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा यांचे योगदान अमूल्य ठरले. शौर्य, निडरता आणि मातृभूमीवरील प्रेम यांचे जिवंत उदाहरण म्हणजे कॅप्टन बत्रा.

बालपणापासूनच धाडसी प्रवृत्ती
विक्रम बत्रा यांचा जन्म 9 सप्टेंबर 1974 रोजी हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे झाला. बालवयातच त्यांच्यातील साहसगुण दिसू लागले होते. एकदा शाळेच्या बसखाली पडलेल्या मुलीचा जीव धोक्यात असताना त्यांनी जीवाची पर्वा न करता तिचे प्राण वाचवले.

1985 साली दूरदर्शनवरील ‘परमवीर चक्र’ या मालिकेचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला आणि तेव्हापासून सैन्यात भरती होण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. हाँगकाँगमधील एका शिपिंग कंपनीमध्ये मर्चंट नेव्हीत निवड होऊनही त्यांनी ती नाकारून भारतीय सैन्यात भरती होण्याचा मार्ग स्वीकारला.

कारगिल युद्धाची सुरुवात
1999 मध्ये जेव्हा पाकिस्तानने कारगिलमधील उंच शिखरे बळकावली, तेव्हा लेफ्टनंट असलेल्या विक्रम बत्रा यांना 19 जून रोजी 5140 क्रमांकाच्या शिखरावर पाकिस्तानी तळ नष्ट करण्याचे आदेश मिळाले. या शिखरावर मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी सैनिक तैनात होते.

त्यांच्या कमांडिंग ऑफिसर कर्नल योगेश जोशी यांनी विक्रम आणि ले. संजीव जामवाल यांना शिखरावरील चौकी ताब्यात घेण्याची जबाबदारी दिली. तीव्र थंडी, धुके आणि प्रतिकूल हवामानाच्या अडथळ्यांवर मात करत त्यांनी हे मिशन यशस्वी केले.

त्यांनी विजय मिळवल्यानंतर दिलेला संदेश होता – “ये दिल मांगे मोअर!” – जो भारतभर लोकप्रिय झाला.

धुक्यामुळे कठीण चढाई – आणि संपर्क तुटलेला
या मोहिमेत घनदाट धुक्यामुळे आपल्या जवानांची चढाई अत्यंत कठीण झाली होती. हे मोठे दुर्दैव होते की या मोहिमेसाठी गेलेल्या अनेक जवानांचा त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा कधीच संपर्क झाला नाही.

7 जुलै 1999 – अंधारातला पराक्रम
शत्रूने शिखरावर कब्जा केल्याची माहिती मिळाल्यानंतर विक्रम बत्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 7 जुलै 1999 च्या रात्री धाडसी हल्ला चढवला. त्यात विक्रम बत्रा गंभीर जखमी झाले. शेवटच्या श्वासापर्यंत ते लढत राहिले.

8 जुलै रोजी भारताने 4875 क्रमांकाचे शिखर ताब्यात घेतले, परंतु त्यासाठी विक्रम बत्रांसारखा पराक्रमी अधिकारी देशाने गमावला.

सर्वोच्च सन्मान – परमवीर चक्र
कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च शौर्य सन्मान ‘परमवीर चक्र’ देण्यात आला. 26 जानेवारी 2000 रोजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्याहस्ते त्यांच्या वडिलांनी – श्री. गिरधारीलाल बत्रा – यावेळी हा सन्मान स्वीकारला.

तरुणांसाठी प्रेरणास्थान
फक्त 24-25 वर्षांच्या आयुष्यात कॅप्टन बत्रा यांनी आपल्या मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिले. स्वतःच्या आयुष्याचा, कुटुंबाचा विचार न करता देशासाठी प्राण अर्पण करणारे कॅप्टन बत्रा आजच्या तरुणांसाठी शौर्य, कर्तव्य आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान ठरले आहेत.

कॅप्टन विक्रम बत्रा – एक नाव, एक इतिहास.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *