४० वर्षांची सोबत संपली: नांदणीच्या महादेवी हत्तीचा भावनिक निरोप; कायदा विरुद्ध भावना..

नांदणी गावातील ४० वर्षांपासून मठात वास्तव्य करत असलेल्या महादेवी या हत्तीला गुजरातमधील खासगी ‘वनतारा’ प्राणी केंद्रात हलवण्यात आले. गावकऱ्यांसाठी आणि जैन समाजासाठी ही घटना भावनिक धक्का ठरली. धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा भाग असलेली महादेवी अचानक त्यांच्या दैनंदिन जीवनातून निघून गेली आणि ‘भावना विरुद्ध कायदा’ या संघर्षात कायदा जिंकला.


महादेवी: एक जीवंत परंपरा
नांदणी गावातील श्री जिनसेन भट्टारक मठात गेल्या ४० वर्षांपासून महादेवीचा वास होता. ती केवळ एक हत्ती नव्हती, तर गावाच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग होती. पंचकल्याण पूजा, जैन धार्मिक सोहळे, आणि मिरवणुकांमध्ये तिचा सक्रीय सहभाग असायचा. तिच्या शांत आणि शिस्तबद्ध स्वभावामुळे ती गावकऱ्यांच्या हृदयात स्थान मिळवू शकली. अनेकांना ती ‘गावची शान’ आणि ‘घराघरातील लाडकी लेक’ वाटायची.



भावना विरुद्ध कायदा: संघर्षाची सुरुवात
महादेवीच्या हस्तांतरणाचा निर्णय घेतल्यावर गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला. स्थानिक नेते, आमदार आणि खासदार यांच्याकडून या भावनिक विषयावर मौन पाळण्यात आले. महादेवीवर गावकऱ्यांचा जसा प्रेमभाव होता, तसाच धार्मिक संस्थेचा वारसाही होता. मात्र, कायद्यानुसार वन्य प्राणी कायद्यांतर्गत हत्तीला खासगी संस्थेकडे ठेवणे बेकायदेशीर ठरते, यामुळे वनविभागाने हस्तक्षेप केला.


वनतारा ट्रस्टची कायदेशीर लढत
वनतारा ट्रस्टने महादेवीवर हक्क सांगत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानुसार, मठाने परवानगी न घेता महादेवीची मिरवणूक केली होती, असा आरोप करण्यात आला. कोर्टाने याचिकेला दुजोरा देत महादेवीला वनतारा केंद्रात हलवण्याचे आदेश दिले. महाडेवीच्या बाजूने मठ आणि गावकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र २८ जुलै २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने देखील मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

भावनिक निरोपाचे क्षण
महादेवीला नांदणीमधून हलवताना संपूर्ण गाव भावविवश झाले. मठाधिपती जिनसेन महाराजांनी स्वतः तिच्या मस्तकावर हार अर्पण करत भावनिक निरोप दिला. उपस्थित अनेक गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. महादेवीच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. काही युवकांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली, मात्र पोलीसांनी सौम्य लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली.



महादेवीचा हक्क कोणाचा?
ही लढत केवळ एका हत्तीची नव्हती. ती लढत होती भावना आणि कायद्याच्या संघर्षाची. गावकऱ्यांनी प्रश्न विचारला की, पैसा, सत्ता आणि कायदा हे नेहमीच माणसाच्या भावना जिंकू शकतात का? खासदार राजू शेट्टी यांनीही या निर्णयावर तीव्र शब्दांत टीका करत, “एका बड्या उद्योगपतीच्या बाळहट्टाला समाजाच्या भावना कुर्बान झाल्या,” असे म्हटले.

निरोप घेताना. महादेवी 😭



सारांश:
महादेवी हत्ती गेल्या ४० वर्षांपासून नांदणीच्या मठात होती, ती गावाची शान मानली जात होती.

वनतारा ट्रस्टने कायदेशीर लढाई जिंकून महादेवीला गुजरातला हलवले.

गावकऱ्यांच्या भावना पायदळी तुडवण्यात आल्याची भावना गावात पसरली, महादेवीही अश्रुपूर्ण निरोपाने रवाना झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *