कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून ठाण्यानजीक दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. सकाळी ९.२० च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. तीन प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर कळव्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण होत असताना, मुंबईहून आलेल्या दुःखद बातमीमुळे देशाचं खरं वास्तव समोर आलं आहे. ट्रेनमधून पडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. भारतीय रेल्वे लाखो लोकांच्या जीवनाचा कणा आहे, परंतु आज ती असुरक्षितता, गर्दी आणि अराजकतेचे प्रतीक बनली आहे.मोदी सरकारची ११ वर्षे, कोणतीही जबाबदारी नाही, कोणताही बदल नाही, फक्त प्रचार, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.
सरकारने २०२५ बद्दल बोलणं थांबलं असून आता २०४७ ची स्वप्न दाखवत आहेत. आज देश कोणत्या परिस्थितीला तोंड देत आहे ते कोण पाहणार? मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमी यातून लवकर बरे होतील अशी आशा करतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्या नवीन लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होत आहेत त्यामध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोज सिस्टिम असेल. २३८ नव्या एसी लोकल मिळणार आहेत. या लोकल डोअर क्लोज फिटमेंटसह रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. तसेच ज्या लोकल सध्या मध्य रेल्वेवर धावत आहेत, त्या लोकल्समध्ये रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे आपोआप बंद होतील अशी सिस्टिम बसवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
Leave a Reply