‘रात्री 9 नंतर बाहेर…’; पुजाराच्या पत्नीसमोरच रोहितने सांगितला नवऱ्याचा तिलाही ठाऊक नसलेला किस्सा

एकीकडे भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडला रवाना झाला असून 20 जूनपासून या नव्या संघाची खरी परीक्षा सुरु होणार आहे. असं असतानाच दुसरीकडे मुंबईमध्ये नुकतीच निवृत्ती स्वीकारलेल्या रोहित शर्माने एका पुस्तक प्रकाशनाला हजेरी लावली. रोहितचा जवळचा मित्र आणि जुना सहकारी चेतेश्वर पुजाराच्या पत्नीनं लिहिलेल्या या पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात रोहितची छोटेखानी मुलाखत झाली.

कसोटीमधील भरवाशाचा फलंदाज असलेला चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्माचं मैदानावर विशेष बॉण्डींग होतं. याचं कारण म्हणजे भारताचं क्षेत्ररक्षण असताना स्लीपमध्ये रोहित, पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे त्रिकूट उभं असायचं. दोन चेंडूंदरम्यानच्या गप्पा असो किंवा अवघड कॅच असो हे तिघेही मैदानात आपल्या सिनिअरीटीचा दबदबा कायम ठेवत कल्ला करताना दिसायचे. याच आपल्या दोस्ताच्या पत्नीनं लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी रोहित हजर होता. यावेळी त्याने पुजाराबरोबरच एक रंजक किस्सा सांगितला.

कोणत्या कार्यक्रमात बोलला रोहित?
‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ हे चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजा पाबरीने लिहिलेल्या पुस्तकाचं सोमवारी मुंबईत प्रकाशन झालं. भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेबरोबरच रोहित शर्मा या कार्यक्रमाला सपत्नीक उपस्थित होता. रोहितने यावेळी 2012 साली भारत अ संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेलेला असतानाच किस्सा सांगितला. तसेच हा किस्सा सांगताना नक्कीच याचा उल्लेख पुस्तकात नसणार असंही म्हटलं आहे. “2012 च्या वेस्ट इंडिजच्या भारत अ दौऱ्यासंदर्भात काही आहे का यात? काय झालं होतं वगैरे?” असा सवाल रोहितने विचारला असता पुजाराने, “मी सांगितलं नाही तिला. म्हणजे तिला ठाऊक आहे पण सविस्तर काही माहित नाही,” असं उत्तर दिलं.

नेमकं घडलं काय पुजारानेच सांगितलं
पुढे पुजारानेच नेमकं काय घडलं ते सांगितलं. “मी शाकाहारी असल्याने आम्ही रात्री शाकाहारी जेवण शोधत होतो. आम्ही त्रिनिनाद आणि टोबॅगोमध्ये होतो जिथं आम्ही रात्री 11 ला बाहेर पडलो होतो. आम्हाला जेवण मिळालं तर नाही पण जेव्हा आम्ही परत येत होतो तेव्हा काही चोरांनी मला लुटलं. मी यासंदर्भात तुम्हाला फारसं सांगू शकत नाही. पण तो ज्या गोष्टीचा उल्लेख करतोय ती हीच घटना आहे,” असं पुजारा म्हणाला.

रोहित हसत म्हणाला…
हे ऐकताच हसून रोहितने, “याचं तात्पर्य काय की हा हट्टी आहे. आम्ही त्याला सांगितलेलं की रात्री बाहेर जाऊ नको. तशी ताकीदही दिली होती. अगदी स्पष्ट सांगितलेलं रात्री 9 नंतर अजिबात बाहेर पडू नकोस. हे इंडिज आहे, पण त्याने आमचं ऐकलं नाही,” असं सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *